का असतो बाप्पा दीड दिवसांचा? जाणून घ्या पुराणातील कथा

गणेश चतुर्थीला गणपतीचं थाटात आगमन झालं अन् बाप्पा दीड दिवसानंतर वाजत गाजत घरीही निघाला आहे. अनेक भाविक दीड दिवसांच्या गणपतीची आपल्या घरी स्थापना करतात. कारण सर्वांनाच ११ दिवस गणपतीची स्थापना करणं शक्य नसतं. पण त्यामागची मूळ संकल्पना वेगळीच आहे.

मूळ संकल्पनेनुसार आपण आपल्या हातानं मातीपासून गणपतीची मूर्ती बनवायला हवी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायला हवी आणि दुसऱ्या दिवशी पुनरागमन म्हणून विसर्जन करायला हवं. पण आपल्याकडे कालांतरानं यात बदल होत गेले. कुणी दीड दिवस, पाच दिवस तर कुणी १० दिवस गणपतीची स्थापना करू लागलं. पण आज आम्ही तुम्हाला दीड दिवसाच्या गणपती ठेवण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे सांगणार आहोत.

श्री व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली आणि त्यासाठी श्रीगणेश त्यांचा लेखनिक होता. त्यामुळे लिहण्याच्या श्रमानं गणेशाच्या अंगातलं पाणी कमी झालं. त्वचा कोरडी पडली आणि गणरायाच्या अंगाला प्रचंड दाह व्हायला लागला. महर्षी व्यासांनी यावर उपाय म्हणून ताबडतोब शरीरावर मातीच्या चिखलाचा लेप लावला. त्यानंतर गणेशाच्या अंगावर थंड पाण्याचा शिडकावा केला. 

याचा परिणाम म्हणजे गणेशाचा ज्वर कमी झाला. त्यादिवशी भाद्रपदातील चतुर्थी होती. चतुर्थीच्या दिवशी हा लेप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचमीला ताप उतरला. त्यानंतर व्यासांनी गणेशाच्या शरीरावरील चिखलाचा लेप काढून तो विसर्जित केला. त्यामुळे चतुर्थीला पार्थिव गणपतीचं पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा रुढ झाली.

पुराण कथेत दडलेलं हे सत्य वाचून आता तरी तुम्हाला दीड दिवसाचा गणपती बसवण्यामागचं खरं कारण कळालं असेल.

Comments

Popular posts from this blog

स्यमंतक मण्याची कथा २ ( पुराण कथा संग्रह -३)

गाईचा महिमा ( पुराण कथा संग्रह -१)

कहाणी आदित्यराणूबाईची